पुणे : ‘केळकर्स हेल्थ सोल्युशन्स’ या निसर्गोपचार संस्थेच्या १९व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या वेळी ‘राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा’ संस्थेच्या संचालिका डॉ. के सत्यालक्ष्मी यांनी उपस्थितांना निसर्गोपचाराचे महत्त्व सांगितले.
‘स्वावलंबी जीवन हेच सुखी जीवन आहे. निसर्गोपचाराने आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी होणे सहज शक्य आहे. ते सुलभ तर आहेच, पण अत्यंत गुणकारीही आहे. आधुनिक रुग्णालये, आवश्यक आरोग्य सेवा अत्यंत खर्चिक स्वरूपात उपलब्ध करून देत आहेत, जे सामान्यांच्या खिशाला परवडत नाही. हेल्थ केअर योजनांची मागणी भारतात वाढत आहे. कमी संख्या असलेल्या संसर्ग रोग बाधित रुग्णांवरील संशोधनावर भर दिला जात आहे आणि त्याच वातावरणातील निरोगी माणसांना रोग का झाले नाहीत, यामागच्या कारणांकडे दुर्लक्ष होत आहे. भारतीय संस्कृतीतील निसर्गोपचाराचा प्रसार आणि अवलंब जनकल्याणासाठी अधिक महत्त्वपूर्ण आहे’, असे विचार डॉ. के सत्यालक्ष्मी यांनी या वेळी मांडले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी मित्रचे संपादक ९६ वर्षीय जी. डी. शर्मा उपस्थित होते. त्यांनी आपले विचार मांडताना, निसर्गोपचाराने अत्यंत सोप्या पद्धतीने जीवन जगता येते हे स्वतःच्या उदाहरणावरून स्पष्ट केले. त्या वेळी ते म्हणाले, ‘भारतीय निसर्गोपचाराचे जनक महात्मा गांधी अजून काही वर्षे असते, तर निसर्गोपचाराचा प्रसार, प्रचार आणि महत्त्व अजून वाढले असते.
‘केळकर्स हेल्थ सोल्युशन्स’च्या डिजिटल माध्यमातील मासिक वार्तापत्राचे अनावरण याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या स्वास्थ्यात सुधारणा करून एका वेगळ्याच उत्साहात संस्थेच्या विविध व्याधीमुक्त सदस्यांनी तसेच प्रशिक्षकांनी व्यायामाची प्रात्याक्षिके करून निसर्गोपचारातील व्यायामाचे महत्त्व सांगितले.
संस्थेच्या माध्यमातून निसर्गोपचाराच्या उपचार पद्धतीचा अवलंब करून व्याधींवर मात करत पुढे आलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी दीपाताई लागू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती शिरीन लिमये यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. सजग नागरिक मंच आणि भारतीय बास्केटबॉल संघाची कप्तान शिरीन लिमये यांना त्यांच्या कार्यासाठी खास धनादेश देऊन गौरवण्यात आले.
तसेच निसर्गोपचार पद्धतीने आपल्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या सभासदांचाही गौरव करण्यात आला. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘केळकर्स हेल्थ’च्या सर्व सल्लागार आणि प्रशिक्षकांचे आभार मानले. या वेळी अशोक झंवर, डॉ. आनंद केळकर, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.